सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा आवाज कमी करायला सांगितल्याचा राग आल्याने तीन ते चार जणांनी माजी नगरसेविकेचा पती आणि तिघांवर हल्ला (Attack) केल्याची घटना नाशिक शहरात (Nashik City) घडली आहे. या घटनेने नाशिक शहरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला
सोमवारी नाशिकरोड परिसरात वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमाच आवाज जास्त वाढवल्याने माजी नगरसेवक जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात आवाज आणि गोंधळ कमी करा सांगितलं. याचा राग आल्याने सोमवारी मध्यरात्री तीन ते चार जणांनी नितीन खर्जुल (Nitin Kharjul) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे. या हल्ल्यात जखमी झालेले नितीन खर्जुल हे शिंदे गटाच्या माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती आहेत.


नाशिकमध्ये कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न
गेल्या काही दिवसात नाशिक शहरात  वाहनांची तोडफोड, वाहनांची जाळपोळ, लूटमार आणि हत्या यांसारख्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. इतकंच काय तर टोळक्यांकडून तलवारी नाचवत गोळीबार केल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. आता तर माजी नगरसेविकाच्या पतीवर हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. 


शहरात रात्रीच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या आठ दिवसांपासून नाशिक शहरात रात्रीचे हल्ले वाढले आहेत. दर दोन दिवसांनी रात्री वाहनं जाळणे तसेच वाहनांची तोडफोड केल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. 


16 मे रोजी पहाटे भद्रकाली हद्दीत एकाच वेळी पाच ठिकाणी अकरा वाहने पेटविण्यात आली होती. तर घरही जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 


21 मे रोजी पहाटे पंचवटीतील पेठ रस्त्यावरील हरि ओम नगरमध्ये चार दुचाकी आणि एका रिक्षाची तोडफोड करण्यात आली होती.


22 मे रोजी मध्यरात्री सिडको मधील तोरणा नगर मध्ये घराबाहेर पार्क केलेली रिक्षा पेटविण्यात आली होती. 


तर  शनिवारी म्हणजे 25 मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित दीपक ठोंबरे (वय 36) याने हातात कोयता घेऊन नागरिकांना शिवीगाळ करत मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या स्प्लेंडर हॉलबाहेरील विवाहसोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडींच्या चार-पाच वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी इंदीरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असू संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.  रात्री होणाऱ्या या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.