योगेश खरे, झी मीडिया, नाशिक :  सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात असलेल्या नाशिक परिसरात सध्या दुर्गपर्यटकांची रेलचेल आहे. पावसाळयातलं ट्रेकिंग तर इथे सध्या जोमात आहे. मात्र या परिसरात अपघातांचं प्रमाण वाढल्यानं, पर्यटन विभागाकडून इथं फिरतं प्राथमिक उपचार केंद्र सुरु करण्याची मागणी होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्ह्यातल्या पंधरा तालुक्यांत ६५ किल्ले आहेत. यात सर्वाधिक आकर्षणाचं केंद्र आहे तो हरीश्चंद्रगड. मात्र कुठलीही काळजी न घेता आणि अनुभव नसताना, हौशी पर्यटकांकडून जिल्ह्यातले किल्ले चढण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून लोकं पोहोचलेले नाहीत, अशा ठिकाणी जाण्याचं धाडस लोकं करु लागले आहेत. त्यातून अपघात आणि अप्रिय घटनांना निमंत्रण दिलं जात आहे. म्हणून अशांवर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त होत आहे. 


आरोग्याच्या दृष्टिकोनातून सध्या ट्रेकिंगकडे कल वाढताना दिसतं आहे. मात्र अनेक ठिकाणी निसर्गाचा निर्भेळ आनंद घेण्याऐवजी, अनेक जण मद्यपान, जोरजोरात नाचगाणी करत इथलं निसर्गरम्य वातावरण प्रदूषित करतात. अशा गोष्टी टाळण्यासाठी पर्यटन विभागानं काळजी घेण्याचं आवाहन निसर्गप्रेमी करत आहेत. 


महानगरातले पर्यटक सध्या शहरांना कंटाळले आहेत. त्यामुळेच मुंबई नजिक असलेलं नाशिक पसंतीचं पर्यटनकेंद्र बनलं आहे. म्हणूनच  या गोष्टींचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे.