योगेश खरे, नाशिक : नाशिकमध्ये जेलरोड येथे वीज वितरण कंपनीच्या मनमानीला कंटाळून कार्यालयात पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न एका ग्राहकाने केला आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला. मात्र यानिमित्ताने वीजबिलं त्यामुळे होणारा गृहकलह आणि कर्मचाऱ्यांची लाचखोरी हा मुद्दा पुढे आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकरोड परिसरात मॉडेल कॉलनीत राहणारे प्रशांत जाधव हे रिक्षाचालक आहेत. गेल्या सात महिन्यांपासून भाडेकरू म्हणून या घरात राहतात. घरात ट्यूब, पंखा, टीव्ही आणि किरकोळ वीजेची उपकरणं वापरतात. वापर कमी असूनही बिल भरमसाठ आल्याने त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून बील भरलं नाही. जुलै महिन्यात मीटर बदलण्याची तक्रारही केली. मात्र महावितरणने नोटीस न देता वीज पुरवठा खंडीत केला. अखेर गुरूवारी प्रशांत जाधव यांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी महावितरणच्या कार्यालयातच पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न केला. 



ही एकमेव घटना नाही. नाशिक परिमंडळात वीजबिलातले घोळ सातत्याने पुढे येत आहेत. त्यातच थकबाकी वसुलीसाठी जबरदस्ती सुरू असल्याने ग्रामीण भागात कर्मचारी आणि नागरिकांमध्ये तणाव वाढला आहे. 


ग्राहकांशी संपर्कात असलेले महावितरणचे कर्मचारी, त्यांचे उर्मट वागणे आणि सततची चिरीमीरीची मागणी यामुळे हा तणाव वाढला आहे. त्यामुळे ग्राहकाभिमूख संशोधन करून वीज मंडळाने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.