Death Threat to Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असून, अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी धमकी देणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून हा विकृतपणा असल्याचं सांगत संताप व्यक्त केला आहे. तसंच धमकी देणाऱ्याच्या ट्वीटर (Twitter) बायोमध्ये भाजपा कार्यकर्ता उल्लेख असून त्यासंबंधी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"अलीकडे सोशल मीडियावर काहींना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही पक्षांबाबत, नेत्यांबाबत लोकांच्या मनात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. उदाहरण म्हणजे शरद पवार यांनी एका कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरला औरंगाबादच म्हणणार अशी खुशाल चुकीची बातमी एका वृत्तवाहिनीने दिली. शरद पवार इतकी वर्षं काम करत असताना चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. दिलगिरी व्यक्त करण्याआधी बातमी खरी आहे की खोटी हे तपासलं पाहिजे," असं आवाहन अजित पवार यांनी केलं. 


"तुमचाही दाभोलकर होणार अशी जीवे मारण्याची धमकी शरद पवारांना देण्यात आली आहे. ते कोणाचं अकाऊंट आहे याची माहिती घेतली. सौरभ पिंपळकरच्या ट्विटर अकाऊंटवर हे ट्वीट केलं आहे. त्याच्या ट्वीटरच्या बायोमध्ये तो भाजपा कार्यकर्ता असल्याचं लिहिलं आहे. आता तो खरंच भाजपाचा कार्यकर्ता आहे का हे मला माहिती नाही. त्यांच्या पक्षाने असं बोलायला लावलं आहे का?," अशी विचारणा अजित पवारांनी केली आहे. 


"विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे. अधिकाराचा गैरवापर कशाला करायचा? कारण नसताना एका राष्ट्रीय नेत्याबद्दल अशाप्रकारे बदनामीकार बोलण्याचा अधिकार कोणी दिला.? सुप्रियाने याबद्दल तक्रार केलेली असेल. मी मुख्यमंत्र्यांची माहिती घेतली तर ते दोन ते तीन दिवस बाहेर गेल्याची माहिती मिळाली.उपमुख्यमंत्र्यांना फोन केला पण लागला नाही," अशी माहिती अजित पवारांनी दिली. 


पुढे ते म्हणाले की "सौरभ पिंपळकरचा मास्टरमाइंड कोण, त्याने मोबाइलवरुन कोणाशी संपर्क केला याची माहिती मिळाली पाहिजे. कारण नसताना इतर राजकीय पक्षांच्या नेत्याची बदनामी करायची, त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार करायचा. या गोष्टींचा मी धिक्कार करतो. मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो त्यांनी चुका केल्या म्हणून आपण करता कामा नये". पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. अटकेची कारवाई झाली पाहिजे. नियमांतर्गत बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.