पुणे : पुण्यातील संभाव्य पाणीकपात टळली आहे. शहराला मिळणाऱ्या १५ टीएमसी पाण्याचा कोटा कायम ठेवण्याचा निर्णय, मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुण्याचा पाणीकोटा साडेसहा टीएमसीने कमी करण्याचा आदेश जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वी दिला होता. 


पुणे पालिकेला या निर्णयामुळे मोठा झटका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहराची लोकसंख्या आणि पाणीवापराचे निकष लक्षात घेऊन पुणे महापालिकेला वार्षिक ८.१९ टीएमसी पाणीपुरवठा करण्यात यावा, असं या आदेशात म्हटलं होतं. सध्या वर्षाला सुमारे १५ टीएमसी पाणी वापरणाऱ्या पुणे पालिकेला या निर्णयामुळे मोठा झटका बसला होता. 


नव्या वादाला तोंड फुटलं होतं


या पार्श्वभूमीवर आगामी काळात धरणं भरलेली असूनही पुण्यावर पाणीकपातीचं संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यावरून पुणे महापालिका विरुद्ध जलसंपदा विभाग यांच्यात नव्या वादाला तोंड फुटलं होतं. याच पार्श्वभूमीवर दोन्ही विभागाचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. 


फेब्रुवारीत निर्णय होण्याची शक्यता


या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुणे शहराची वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता शहराचा पाणी कोटा ३ टीएमसीने वाढवण्याबाबत म्हणजे १८ टीएमसी करण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. याबाबत फेब्रुवारीत निर्णय होण्याची शक्यता आहे.