उस्मानाबाद : जिल्ह्यातील कळंब तालुक्यात विजेचा धक्का लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रामेश्वर मनोहर शेळके असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून तो बोर्डा गावचा रहिवासी होता. शनिवारी रामेश्वर शेळके मजुरीसाठी एका शेतात बैलजोडी घेऊन गेले होते. याठिकाणी पेरणीचे काम सुरु होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शेतात एक विजेचा खांब होता. या खांबावरील एक तार खाली शेतात लटकत होती. पेरणी सुरु असताना बैलाचा स्पर्श या तारेला झाला. बैलाला विजेचा धक्का लागल्यानंतर रामेश्वर शेळके त्याला वाचवण्यासाठी गेले. मात्र, या प्रयत्नात त्यांनाही विजेचा जोरदार झटका बसला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 


रामेश्वर शेळके यांच्यामागे दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. घराचा एकमेव आधारस्तंभ गेल्यामुळे कुटुंब शोकाकुल झाले आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांकडून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.