सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : काँग्रेस (Congress) प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे (Sanjay Balgude) यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पत्र लिहील्यामुळे सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना स्वतः च्या मालकीच्या घरात राहात असल्यास घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत मिळत होती. ही सवलत आता रद्द करण्यात आली असून पुणेकरांना नोटीस आल्या आहेत. या निर्णयाविरोधात आता प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय बालगुडे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहीलं आहे. या पत्रात संजय बालगुडे यांनी दादा पुणेकरांना वाचवा असे म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हटंलय पत्रात?


"पुण्यातील नागरिकांना 1970 सालापासून स्वतः च्या मालकीच्या घरात राहात असल्यास घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत मिळत होती. 2011 मध्ये महालेखा परिक्षकांनी याबाबत नोंदवला होता. पुणे महापालिकेच्या गेल्या 30 वर्षांपासून असलेल्या अनेक निर्णयांबाबतही आक्षेप नोंदवला होता. याचाच आधार घेऊन 2018 मध्ये तुमचे सरकार असताना व तत्कालीन मुख्यमंत्र्याच्याकडे नगर विकास खाते असताना एक अध्यादेश काढण्यात आला. या अध्यादेशानुसार 1900 सालापासून पुणेकरांना मिळणारी घरपट्टीतील सवलत रद्द करण्या आली आहे. केवळ सवलतच रद्द केली नाही तर 1300 सालापासून सन 2018 पर्यंत मिळालेली सवलत व्याजासहित पुणेकरांकडून वसूल करा असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आपण वारंवार आश्वासन देऊन ही आता पुणेकरांना नोटीस येऊ लागल्या आहेत. 40 टक्के सवलत पुणेकरांना मिळाली पाहिजे. चंद्रकांत दादा आपण पालकमंत्री असून आपण पुणेकरांना वाचवा," असे या पत्रात म्हटलं आहे.


सामान्य पुणेकर घरपट्टीच्या ओझ्याखाली 


"पुणे महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता असतांना  वसूली व व्याज घेण्यावर स्थगिती दयावी असा ठराव करून सरकार कडे पाठविण्यात आला. याबाबत आपण पुन्हा मंत्री झाल्यावर आपल्याला याबाबत विचारले असता, या वसूलीलाच अध्यादेशाला स्थगिती देऊन पुणेकरांना विलासा देऊ असे जाहीर सांगितले होते. पण अद्याप याबाबत शुध्दी पत्रक शासनाने पाठवलेले नाही असे मनपा आयुक्तांनी कळवले आहे. सध्या पुणेकर नागरिकांना सन 2018 पासून 40 टक्के सवलत रद्द धरून थकीत रक्कम व्याजासहित भरावी अशा नोटीसा व संदेश मोबाईलवर येत जाहेत. सामान्य पुणेकर हा घरपट्टीच्या ओझ्या खाली दबून गेला आहे. त्यामुळे आपण आत्ता लक्ष देऊन पुणेकरांना वाचवल पाहिजे," असेही यावेळी बालगुडे म्हणाले.


तुम्हाला पुणेकरांनी आमदार केले आहे


"महानगरपालिकेने राज्य सरकारकडे जो प्रस्ताव पाठवला होता तो अद्याप मान्य झालेला नाही. त्यामुळे यावर्षी प्रत्येक करदात्याला घरपट्टीमध्ये 2018 पासूनची थकीत रक्कम समाविष्ट करून बिल येत आहेत. पुणेकरांची ही सरळ सरळ फसवणूक व अन्याय करणारी आहे. ज्या मध्यमवर्गाने व गरिब माणसाने कर्ज काढून घर विकत घेतली आहेत अशा नागरिकांस घरपट्टी भरण्यासाठी स्वतःचे घर गहाण ठेवावे लागेल अथवा विकावे लागेल. दादा, तुम्ही कोल्हापूरला असताना तेथील नागरिकांसाठी 350 कोटी रुपयांचा टोल माफ केला होता. ते पैसे सरकारने भरले होते. सध्या तुम्हाला पुणेकरांनी आमदार केले आहे त्यांच्या बाबतीत दुजाभाव करू नका. आपण पुण्याचे पालकमंत्री आहात,आणि गेल्या चार वर्षांपासून पुणेकर आहोत असा आमचा समज आहे. पुणेकर नागरिकांना या शुक्लकाष्टातून आपण शब्द दिल्याप्रमाणे वाचवावे ही पुणेकरांच्यावतीने विनंती आहे," असे बालगुडे यांनी या पत्रात म्हटले आहे.