मुंबई : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचा दावा हवामान खात्यानं केलाय. येत्या ४८ तासात विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम आणि जोरदार पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर उत्तर कोकणात जोरदार पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे.


तब्बल दीड महिन्यानंतर सोलापूरमध्ये पाऊस झाला आहे. सुरुवातीला एक दोन वेळा तुरळक पाऊस पडल्यानंतर सोलापुरातून पाऊस गायब झाला होता. जुलै संपत आला तरी पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. शिवाय पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसानं ओढ दिलेली असतानाच आज दुपारी बारावाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. तब्बल दोन तास पाऊस सुरु झाला होता. पावसामुळं सोलापुरात अल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे.