मुंबई : मुंबईसह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून येत्या २४ तासात अतिवॄष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कालपासूनच असलेल्या पावसानं मुंबईत आता थोडीशी उसंत घेतली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून अनेक धरणांमधून पाणी सोडण्यात आलं आहे. 


मुंबईसह पावसानं कोकणालाही झोडपलं आहे. येत्या २४ तासांत मुंबईसह, उत्तर आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. माणगाव खोर्‍यातील २७ गावांचा संपर्क तुटला होता. तर तिकडं रत्नागिरी आणि रायगडला जिल्ह्यातही पाऊस सुरु आहे.


पुण्यात काल रात्रभर सुरु असणारा पाऊस जरा थांबला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले होते. ज्यामधून १२ हजार क्सुसेस वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू होता. तिकडे सातारा जिल्ह्यातही पाऊस सुरु आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कोयना परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोयना धरणात झपाट्यानं पाण्याची पातळी वाढत झाली.


दरम्यान, मराठावाड्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आजही अनेक ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण असून पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जायकवाडी धरणातील पाण्याची पातळीही वाढली असून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. इकडे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरुच आहे. गंगापूर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून ४ हजार क्यूसेस वेगानं विसर्ग सुरु आहे.


तर एकीकडे मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस बरसत असताना विदर्भातील काही भागात संततधार पाऊस सुरु आहे. अकोला, चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली इथं सध्या पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण आहे.