पुणे : पुण्यातल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत सरकारमधून बाहेर पडणे आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोतांच्या निलंबनावरून दोन गट पडले. दोन्ही बाजुंच्या गटांनी तीव्र भावना केल्या. काहींनी सदाभाऊ खोतांवर जोरदार टीका केली. तर काहींनी त्यांचं समर्थन केलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदाभाऊ खोत सरकारची भूमिका मांडत असून संघटनेशी विसंगत भूमिका घेतात अशा तक्रारी आल्या असून त्याची गंभीर दखल संघटनेनं घेतल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं. यासंदर्भात सदाभाऊ खोतांकडून ४ जुलैपर्यंत खुलासा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तोपर्यंत तोडगा निघाला तर ठिक अन्यथा लढाईसाठी आपण तयार असल्याचं सांगत सदाभाऊंविरोधात रणशिंग फुंकणार असल्याचं संकेत शेट्टींनी दिले.  


कर्जमाफीवरून शेट्टींनी फडणवीस सरकारचा समाचार घेतला. सातबारा कोरा होणा-या ४० लाख शेतक-यांची नावं जाहीर करण्याचं आव्हान त्यांनी सरकारला दिलंय. कर्जमाफी फसवी असून ६ जुलैपासून देशपातळीवर आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय.


दरम्यान सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्थापन केलेल्या समितीला समोरे जाण्याचं आव्हान स्वीकारले आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजप सरकार बरोबर रहायचे की नाही याबाबत 25 जुलै नंतर निर्णय घेणार असल्याचं राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. तेव्हा आपणही 25 तारखेच्या निर्णयाची वाट बघणार असल्याचं सांगत खोत यांनी सरकारबरोबरच रहाण्याचे संकेत दिले आहेत.