सातारा: नीरा-देवघर पाणी प्रश्नावरुन उदयनराजे यांनी केलेल्या टीकेला शुक्रवारी रामराजे नाईक निंबाळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पक्षश्रेष्ठींनी उदयनराजेंना आवरावे, अन्यथा आम्हाला पक्षातून बाहेर पडण्याची परवानगी द्यावी, असे त्यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांनी नीरा देवघर पाणी प्रश्नावरून रामराजे नाईक निंबाळकर यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. भगीरथ म्हणून घेणाऱ्यांनी लाल बत्तीचा वापर केला आणि लोकांची खिल्ली उडवण्यापलीकडे काही केले नाही, त्यांना देवसुद्धा माफ करणार नाही, असे उदयनराजेंनी म्हटले होते. 


या टीकेला प्रत्युत्तर देताना रामराजे निंबाळकर यांनी म्हटले की, उदयनराजेंनी मला स्वयंघोषित भगीरथ म्हटले. मला वाटतं की, ते स्वयंघोषित छत्रपती आहे. त्यामुळे आपण दोन्ही स्वयंघोषित लोकांनी एकमेकांशी वाद घालणे योग्य नाही. तुम्हाला कधी वेळ मिळाला आणि तुमचं मन थाऱ्यावर असेल तर एकदा खंडाळ्याच्या पलीकडे खिंडीजवळ नीरा उजवा कालवा आहे. उदयनराजेंनी त्याठिकाणी आपल्या लँडक्रुझर गाडीतून जावे आणि डाव्या दिशेने वळून आंदरूडपर्यंत प्रवास करावा. त्यावेळी उदयनराजेंना समजेल की, ज्या भागाला नीरा- देवघर योजनेतील पाणी कधीही मिळू शकत नव्हते अशा भागापर्यंत १०-१५ बोगदे पाडून मी कृष्णेचे पाणी पोहोचवले. त्यामुळे काहीजण मला भगीरथ म्हणत असतील किंवा मी गेली १५ वर्ष लाल दिव्याच्या गाडीतून फिरत असेल तर तुम्हाला दु:ख होण्याचे कारण काय आहे, असा सवाल रामराजे निंबाळकर यांनी उदयनराजेंना विचारला. 


तुम्हालाही दोन वर्षे लाल दिवा मिळाला होता. या काळात तुम्ही काय केले? तुम्ही स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणवता आणि एनओसीसाठी लोकांकडून पैसे खाता. असले धंदे आम्ही कधी केले नाहीत. फलटणमध्ये येऊन तुम्ही आम्हाला बांडगुळ म्हणता. मात्र, याच बांडगुळांनी तुमच्या आधीच्या पिढीला सांभाळले होते, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत रामराजेंनी उदयनराजेंचा समाचार घेतला.