Sanjay Raut On Wagh Nakhe: लंडनहून महाराष्ट्रात आणलेल्या शिवकालीन वाघनखांच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शुक्रवारी वाघनखं वस्तुसंग्रहालयात ठेवण्यासंदर्भातील कार्यक्रमामध्ये विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नकली वाघांना वाघनखांचे महत्त्व कसे कळणार अशी टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघनखांवर विवाद करुन नये. या रोगाचा सामना आजचा नाही. छत्रपतींच्या काळातही तो होता. मात्र चाणाक्षपणे तो विरोध मोडून काढत शिवरांयांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. वाघनखे ही छत्रपती शिवारायांच्या पराक्रमाचे निदर्शक आङेत. त्यावर कोणी शंका घेऊन नये, असं म्हणत विरोधकांवर टीका केली. या टीकेला आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कोणत्या तरी इतिहासाशी काही संबंध आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी फडणवीस यांच्या विधानाचाही आपल्या खास शैलीत समाचार घेतला. 


राऊतांनी घेतला समाचार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यामधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवण्यात आली असून या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपली मतं मांडली. यावर संजय राऊत यांना पत्रकारांनी सवाल केला असता त्यांनी थेट शिंदे, फडणवीसांबरोबर अजित पवारांचा उल्लेख करत हे तिन्ही नेते नकली असल्याचा टोला लगावला. वाघनखांवरुन बोलताना उपहासात्मक टीप्पणी करत हे तिन्ही नेते ड्युप्लिकेट आहेत, असंही राऊत म्हणाले.


ज्यांनी शत्रूंशी हात मिळवणी केली...


"जे कोणी बोलत आहेत ते बेईमान लोक आहेत. खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांची अवलाद असणारे हे आम्हाला नकली बोलणार," असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला. "ज्यांनी शत्रूशी हात मिळवणी केली, ज्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे आम्हाला नकली बोलणार," असा टोला राऊत यांनी शिंदेंना लगावला. "मुळात ही वाघनखं ऐतिहासिक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी खरंच ती वाघनखं वापरली असतील तर आम्ही त्या वाघनखांना प्रणाम करतो. पण इतिहास आणि इतिहासतज्ञांबरोबरच लंडनचं म्युझियम सांगतयं की, खात्री नाही की ती वाघनखं तिच आहेत का," असंही राऊतांनी नमूद केलं. 


शिवयारांवरील श्रद्धेचा व्यापार


"जसं भाजपा एकेकाळी मतांसाठी गंगाजलाच्या बाटल्या विकत होतं. कुठलही पाणी भरायचे आणि गंगाजल म्हणून विकायचे. त्या पद्धतीने या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात महाराष्ट्रात जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा व्यापार चालवला आहे. वाघनखं ही काय मत मागण्याची वस्तू आहे का? राजकारण करण्याची वस्तू आहे का? ती ऐतिहासिक आणि श्रद्धेची जागा आहे. तुम्ही लोकांना फसवत आहात. ही फसवणूक तुमच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही," असा इशाराच राऊत यांनी भाजपाला दिला आहे. 


फडणवीसांचा कोणत्यातरी इतिहासाशी काही संबंध आहे का?


फडणवीसांना केलेल्या टीकेवरुन बोलताना संजय राऊतांनी, "फडणवीसांचा इतिहासाशी काय संबंध? शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी हे मतांपुरतं बोलायला ठीक आहे पण त्यांचा संबंध काय हे मला त्यांनी सांगावं," असा टोला लगावला. "भारतीय जनता पक्षाचा कोणत्यातरी इतिहासाशी संबंध आलाय का? भाजपचा संबंध ना कधी स्वातंत्र्यसंग्रामाशी आला, ना महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यासाठी आला, ना आणीबाणीच्या संघर्षाशी आला," असंही राऊत म्हणाले. 


...म्हणून ड्युप्लिकेट मलाबद्दल आकर्षण


"वाघनखांचा अपमान इतर कोणीही करत नाही. वाघनखांचा अपमान देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार करत आहेत, हे लोक इतिहासाचा अपमान करत आहेत. हे स्वतः ड्युप्लिकेट आहेत त्यांना स्वतःला ड्युप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे," असा टोलाही राऊतांनी थेट नाव घेत लगावला. "छत्रपतींच्या वाघनखांविषयी आम्हाला अत्यंत आदर आणि श्रद्धा आहे, पण तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर वाघनखं... वाघनखं... करत आहात त्याआधी स्वतःची नखं नीट कापा मग वाघनखांवर बोला," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.