नाशिक : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चांगलचं वातावरण तापलं आहे. 
पत्रात परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पण अनिल देशमुख यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहे. या सर्व प्रकरणावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. आमची राजवट देखील उत्तम आहे, पण काहीतरी दुरुस्त करावं लागेल.. असं राऊत म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत म्हणले, 'परमबीर सिंग यांचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात नक्कीच चर्चेचा विषय आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र पाठवलं, त्या पत्राला लोक लेटर बॉम्ब म्हणत आहेत. मात्र यात सत्यता किती हे मुख्यमंत्री आणि पवार साहेब तपासून बघतील. स्वतः अनिल देशमुख यांनी पत्राच्या चौकशीची मागणी केली आहे. मात्र प्रत्येकाने नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं राऊत म्हणाले. 



'सरकारमधल्या प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपले पाय प्रत्येकाने तपासले पाहिजे नक्की जमिनीवर आहेत का? पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. आमची राजवट देखील उत्तम चालली आहे , पण काही तरी दुरुस्त करावं लागेल.' असं वक्तव्य  राऊत यांनी केलं आहे. 


योग्य भूमिका आणि निर्णय घेण्यासाठी पवार साहेब भूमिका पार पाडतील. विरोधी पक्षाने मागणी केली म्हणून सरकार चालत नाही.  मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.