दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणी प्रशासकीय मंडळ बरखास्तीबरोबरच करून बाजार समितीच्या सचिवांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा सरकारने आज विधानसभेत केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाशीम जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नेमल्यानंतर मोठया प्रमाणावर भ्रष्टचार झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या भ्रष्टाचाराप्रकरणी काय कारवाई केली असा प्रश्न आमदार सुनील देशमुख यांनी विचारला होता. हे प्रकरण न्यायालयात असून सचिवांनी कागदपत्रे दिली नाहीत, असं उत्तर पणनमंत्री राम शिंदे यांनी दिले. या उत्तरावर आक्षेप घेत सरकारचे सचिव ऐकत नाहीत, जे सचिव सरकारचे ऐकत नाहीत. त्यांच्यावर कारवाई का करत नाही, असा सवाल अजित पवार आणि शशिकांत शिंदे यांनी मंत्र्यांना केला आणि सचिवांच्या निलंबनाची मागणी केली. 


या प्रकरणावर सभागृहात गोंधळानंतर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय मंडळ बरखास्त करून सचिवांना निलंबित करण्याची घोषणा राम शिंदे यांनी केली आहे.