जळगाव : दिल्ली म्हणजे फार गंमतीशीर शहर आहे. कांद्याचे भाव वाढले की नेतेमंडळी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन करतात. विशेष करून दिल्लीतल्या नेत्यांना ही सवय जास्त आहे, अशी खोचक टीका, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी जळगावात केली. शेतमालाच्या किंमती वाढल्या की देशात महागाई वाढल्याची ओरड होते. मात्र रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या की स्वस्ताई येते. शेतकरी शेतीसाठी आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गेला असता त्याला ते परवडलं नाही, तर अशावेळी महागाईचा प्रश्न जातो कुठे असा सवाल शरद पवारांनी यावेळी केला. 


दिल्ली शहर स्वतः काही पिकवत नाही


दिल्ली शहर स्वतः काही पिकवत नाही, उलट सगळ्या देशाचं पिकविलेले अन्नधान्य खातं. मात्र शेतात जे काही पिकतं, ते सगळं स्वस्त मिळायला हवं, अशीच मानसिकता दिल्लीकरांची असल्याची टीका त्यांनी केली. जळगावात जैन इरिगेशनतर्फे पदमश्री डॉक्टर आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च तंत्र पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.