Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद चांगलाच पेटला आहे. या वादावरुन शिंदे गटाने राष्ट्रवादीवर(NCP) गंभीर आरोप केला आहे.  महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद(Maharashtra Karnataka Border Dispute) भडकवण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा आरोप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने केली आहे.  कर्नाटकात निवडणुका असल्यानं पवार माथी भडकवत असल्याची टीका देखील करण्यात आली आहे. शिंदे गटाचे नेते नरेश मस्के(Naresh Maske) यांनी हा आरोप केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या मार्फत स्क्रिप्ट दिली. कर्नाटक मध्ये निवडणुक आहे. त्यामुळे भडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तोडण्याची भाषा करणाऱ्यांच्या मागे राष्ट्रवादीच आहे. सीमा भागाच्या संदर्भात राष्ट्रवादीचा हात आहे. तोडोफोडो राष्ट्रवादीची नीती आहे तसे वागतात असेही नरेश मस्के म्हणाले. 


अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट


दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील सदस्यस्थिती, सीमावाद, शेतीच्या समस्या अशा अनेक प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं. सीमावादामुळे राज्यातलं वातावरण चांगलंच पेटलंय. या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये प्रकर्षानं चर्चा झाल्याचंही समजते. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दूरध्वनी करून सीमा प्रश्नावर तसेच गेल्या आठवड्यातील घडामोडींची संपूर्ण माहिती दिली. काल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या दूरध्वनी संवादाचा दाखला सुद्धा त्यांनी दिला. महाराष्ट्राचा विषय अमित शाह यांनी अतिशय गांभीर्यपूर्वक ऐकून घेतला. कालच माध्यमांशी बोलताना हा विषय आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मांडू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. सीमावादावरून संसदेत देखील गदारोळ पहायला मिळाला. सुप्रिया सुळे आणि विनायक राऊतांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला. संसद परिसरातही जोरदार घोषणाबाजी केली.