नवी दिल्ली : Sanjay Raut on Nanar Project रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्पबाबत पुन्हा आशा निर्माण झाल्या आहेत. स्थानिकांच्या विरोधानंतर शिवसेनेने नाणारला विरोध केला. मात्र, हा प्रकल्प रत्नागिरीतच होणार असल्याचे संकेत मिळत आहे. कोकणातल्या ज्या भागात नाणार प्रकल्प होतोय, तिथली शेती, फळबागा, समुद्र, तिथला मच्छिमार समाज यांचा विरोध त्या प्रकल्पाला आहे. कारण या प्रकल्पामुळे त्यांची रोजीरोटी नष्ट होईल यासाठी त्यांचं आंदोलन आजही सुरूच आहे. याचा अर्थ तो प्रकल्प होऊच नये असं नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणातील तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन होत आहे. नाणार या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाल्याचे सूतोवाच केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केले होते. दुसऱ्याच दिवशी कोकण दौऱ्यावर आलेले पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही सकारात्मक भूमिका मांडली. त्यामुळे हा प्रकल्प कोकणातच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच हा प्रकल्प दुसरीकडे म्हणजेच राजापूर येथील बारसू येथे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा प्रकल्प विदर्भात नेण्यात यावा अशी मागणी काँग्रेस नेत्याने आपल्याकडे केल्याचं संजय राऊत यांनी सांगितले आहे.



नाणार प्रकल्पावर संजय राऊत यांनी याविषयीचं भाष्य केले आहे. राऊत म्हणाले, कोकणातल्या ज्या भागात नाणार प्रकल्प होतोय, तिथली शेती, फळबागा, समुद्र, तिथला मच्छिमार समाज यांचा विरोध त्या प्रकल्पाला आहे. कारण या प्रकल्पामुळे त्यांची रोजीरोटी नष्ट होईल यासाठी त्यांचं आंदोलन आजही सुरूच आहे. याचा अर्थ तो प्रकल्प होऊच नये असं नाही. कालच मला विदर्भातले काँग्रेसचे नेते आशिष देशमुख येऊन भेटून गेले. त्यांनी मला सांगितलं की हा प्रकल्प विदर्भात आणता आला तर आम्ही स्वागत करू. 


काँग्रेस नेत्यांने सांगितल्याप्रमाणे हा प्रकल्प समृद्धी महामार्गादरम्यान व्हावा.  या  महामार्गाच्या आसपास काही पाण्याच्या जागा, नद्या, जलप्रकल्प आहेत. तर तिथे हा प्रकल्प होऊ शकला तर महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल, अशी भूमिका आशिष देशमुख यांनी मांडली. याचा अर्थ या प्रकल्पाला विरोध नाही, हे स्पष्ट होत आहे.