Trimbakeshwar Temple Controversy: देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मंदिरात काही तरुणांनी प्रवेश केल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक स्तरावरील अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. गेल्या वर्षीही असाच प्रयत्न करण्यात आला होता. आता या प्रकरणाचीही एसआयटी चौकशी करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.  या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.



त्र्यंबकेश्वर येथे 13 मे रोजी एका गटाकडून धार्मिक यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी काही जणांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मंदिरातील पुरोहितांनी त्याला विरोध केला. मंदिरातील सुरक्षा रक्षकांनीही अडवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी यानंतर रविवारी शांतता समितीची बैठक बोलावत दोन्ही गटांना समज देऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे या प्रकाराचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण तापलं आहे.



पोलिसांनी काय सांगितले?


त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशद्वारावर संदल मिरवणुकी दरम्यान धूप दाखवण्याच्या प्रकाराला धार्मिक रंग देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस आणि दक्षता समितीच्या बैठकीमध्ये हे सत्य समोर आलं ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये हा प्रकार सातत्याने होत असतो, सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा एक भाग म्हणून याकडे बघितले जाते. ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी तीन तास सखोल चौकशी करत याबाबत जातीय तेढ पसरवणारी कुठलीही घटना घडली नसल्याचा निर्वाळा दिला आहे