रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून पगारापासून वंचित रहावं लागलं आहे. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना या कर्मचाऱ्यांना मात्र मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शासन दरबारी न्याय मागण्यासाठी आणि वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी एसटी कर्मचारी सोमवारी आक्रोश आंदोलनाची साद देत असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी एसटी डेपोतील चालक पांडुरंग गडदे यांचा मृतदेह त्यांच्या रहात्या खोलीत आढळून आल्यामुळं एकच खळबल माजली आहे. या चालकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली असली तरीही त्यांच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. 
पण, मागील काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर अद्यापही तोडगा न निघाल्यामुळंच चालकानं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


दरम्यान, पगाराची तारीख उलटूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्याता पगाराची रक्कम जमा झालेली नाही त्यामुळं सातत्यानं तीन महिने हाच प्रकार सुरु राहिल्य़ामुळं सणावाराच्या दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांपुढं मोठी अडचण उभी राहिल्याचं पाहायला मिळत आहे. 


 


कोरोना काळातही महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये असताना एसटी कर्मचाऱ्यांना प्रवाशांना अविरत सेवा देत संकटसमयीसुद्धा आपली सेवा बजावली. पण, हया कोरोना योद्ध्यांकडे मात्र शासनाचं दुर्लक्षच होत असल्याचं पाहायला मिळत असल्यामुळं सध्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पाहायला मिळत आहे.