Swarajya Sanghatna on Jitendra Awhad: स्वराज्य संघटेनेने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या गाडीवरील हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. जितेंद्र आव्हाड ठाण्याला जात असताना स्वराज्य संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करत काच फोडली. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे हा हल्ला केल्याचं स्वराज्य संघटनेने सांगितलं आहे. स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी व्हिडीओ शेअर करत या हल्ल्याची जबाबदारी स्विकारत असल्याचं म्हटलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"या महाराष्ट्रभरात गेल्या 25 वर्षांपासून मला कोणी हात लावू शकत नाही, धमकावू शकत नाही, माझ्यापर्यंत कोणी येऊ शकत नाही या आर्विभावात मुस्लीम मतांच्या लालसेपोटी, मुंब्र्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी आमचे मार्गदर्शक, पक्षप्रमुख संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी बेताल वक्तव्य केलं होतं,' असं ते म्हणाले आहेत.


"आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जेतुद्दीनला मुंबईत फटकावण्याचा प्रयत्न केला. त्याची गाडी फोडली आहे. जेतुद्दीन ढुंगणाला पाय लावून पळाला आहे. दम होता तर त्या ठिकाणी थांबायचं होतं. महापुरुषांविषयी बोलू नको, महाराष्ट्रात जनजीवन विस्कळीत करु नकोस. सबुरीने राहा अन्यथा येणाऱ्या कालावधी महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल," असा इशारा त्यांनी दिला आहे. 


आव्हाडांना पुन्हा केला विधानाचा पुनरुच्चार


"ही विचारांची लढाई आहे. तुम्ही ज्या विचारांवर जात आहात ते शाहू महाराजांचे नाहीत, तुमच्या वडिलांचेही नाहीत. मी तर पुढे बसलो  होतो. गाडीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला. आम्ही पुढे जाऊन थांबलो होतो, पण तोतपर्यंत हे उलटे फिरले. तीनच मुलं होती, पोलिसांकडे चार रिव्हॉल्वर आणि 24 गोळ्या होत्या. या असल्या भ्याड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता स्वभावात फरक पडणार नाही. मुस्लिमांसाठी मी लढत नसतो, मी विषयावर लढतो," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. 


"शाहू महाराजांनी सामाजिक एकता जपली होती, ती या घराण्याने जपायला हवी होती. बोलला बाहुला म्हणून बोलला आणि सगळी परिस्थिती हाताबाहेर गेली. याच्या बोलण्याचा फायदा संभाजी भिडेने घेतला आणि हवं ते काम करुन टाकलं. गाडीवर दगड मारला म्हणून बोलणार नाही असं वाटत असेल. पण आता अजून त्वेषाने, आक्रमकतेने बोलेन. आजपर्यंत अहो, जाओ करत होतो.  तुम्ही विचाराने चुकलात. तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडलेत. आम्ही नाही सोडले. तुम्ही रक्ताचे आणि आम्ही वैचारिक वारसदार आहोत," असं आव्हाड म्हणाले आहेत.


"स्वत:च्या वडिलांनी तुमचा निषेध केला होता. वडील खासदार झाले म्हणून तुम्ही जळत आहात. सर्व पक्षांच्या दरवाजात तुम्ही जाऊन आलात. त्यांनी तिकीट न दिल्याने आणि वडील खासदार झाले यामुळे आग लागल्याने त्यातून बेताल वक्तव्य करत आहात," असा आरोप त्यांनी केला. 


छत्रपती शिवाजीराजांचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी संभाजीराजेंनी गद्दारी केली आहे असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
 
मी पोलिसांना तुम्ही गाडीतून का उतरला नाहीत अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून फायरिंग केलं नाही. नाहीतर फायरिंग करु शकलो असतो असं सांगितलं असा दावा त्यांनी केला. मी मेलो तरी माफी मागणार नाही. माफी त्यांनी महाराष्ट्राची मागितली पाहिजे असंही ते म्हणाले.