रायगड : राज्य सरकारने पदवी परीक्षांसंदर्भातला निर्णय लवकरच घ्यावा, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. १० लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेयर ट्रस्टतर्फे गोरेगावमध्ये कोकणातील १६ महाविद्यालयांना १०० संगणक देऊन कोकणातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी सुप्रिया सुळे भाषणात बोलत होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पदवी परीक्षेची केस कोर्टात चालली आहे. १० तारखेला निर्णय आहे. त्यामुळे मी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती करते, जो काही निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, त्याचा सोक्षमोक्ष १० तारखेला लावा,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 


कोरोना व्हायरसच्या संकटात पदवी परीक्षा घेणं शक्य नसल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्यासाठी आग्रही आहे. परीक्षा घेण्याच्या मुद्द्यावरुन राज्यात महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातही संघर्ष पाहायला मिळाला आहे. 


या कार्यक्रमाला पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंना घेरलं जातंय का? या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी मौन बाळगलं आहे.