कपिल राऊत, झी २४ तास, ठाणे : ठाण्यातल्या औद्योगिक क्षेत्रातलं उत्पादन सध्या घटलंय. आधीच मंदी, त्यात खड्ड्यांची गर्दी... ठाणे जिल्ह्यातल्या वागळे इस्टेट, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडीमधल्या औद्योगिक वसाहतींमधल्या कंपन्यांच्या उत्पादनात दोन महिन्यांपासून ३० ते ४० टक्क्यांची घट झालीय. मंदी हे त्याचं प्रमुख कारण आहेच.... पण या भागातल्या रस्त्यांवरचे खड्डेही त्याला जबाबदार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूरवरून या भागात येणारा माल खड्ड्यांमुळे उशिरा दाखल होतो. त्यामुळे उत्पादनावरही परिणाम होतो आणि 'प्रोडक्शन सायकल' ठप्प होतं... त्याचा परिणाम उत्पादनांच्या निर्मिती किंमतीवरही होतो, असं मत टीजेएसबीचे पदाधिकारी गोपाल गंगल यांनी व्यक्त केलंय. 


ठाण्यातल्या खड्ड्यांना आणि वाहतूक कोंडीला वैतागून गुंतवणूकदार इथे येतच नाहीत. तसंच औद्योगिक वसाहतींमधून तयार झालेला माल जेएनपीटीच्या दिशेने नेण्यासाठी वाहन चालकांकडून अवाच्या सवा भाडं मागतात.


रोजगार हिरावून नेण्यासाठी खड्डे कारणीभूत ठरतायत, हे गंभीर आहे. ठाण्यातल्या तमाम लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनानं या खड्ड्यांकडे वेळीच लक्ष द्यायला हवं.