जालना : विवाहबाह्य संबंधात मुलगा अडसर ठरत असल्याने एका महिलेने आपल्या 6 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची घटना जालनामध्ये घडली आहे. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर या महिलेने मुलगा हरवल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली. जालन्यातील अंबडमध्ये ही घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबड तालुक्यातील डावरगाव इथे राहणारी 21 वर्षीय विवाहित महिला तिच्या नातेवाईकाच्या उपचारासाठी मुलाला घेऊन अंबड इथं दवाखान्यात आली होती. नातेवाईकाला दवाखान्यात भरती केल्यानंतर औषध घेण्यासाठी ही महिला मेडिकलमध्ये गेली. त्याचवेळी तीने आपल्या मुलाला प्रियकराच्या स्वाधीन केलं. त्यानंतर मुलगा हरवल्याचा बहाणा करून या महिलेने अंबड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस यंत्रणा कामाला लागली.


बुधवारी संध्याकाळी या मुलाचा मृतदेह घनसावंगी रस्त्यावरच्य एका नाल्याच्या बाजूला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता या मुलाच्या तोंडामध्ये बोळे कोंबलेले दिसले. याप्रकरणी तपासात पोलिसांना या महिलेवरच संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. महिलेचा प्रियकर नवनाथ जगधने यानेच या मुलाची हत्या केल्याचं समोर आलं.


याप्रकरणी पोलिसांनी शीतल उघडे, नवनाथ जगधने आणि त्यांना मदत करणाऱ्या गणेश रोकडे या तिघांना अटक केली आहे.