मुंबई : नाशिकमधील देवळा येथे एसटी आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिकजवळ झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी असून, या अपघाताची माहिती महामंडळ स्तरावर घेण्यात येत आहे. जे प्रवासी व कर्मचारी या अपघातात मृत झाले आहेत, त्यांच्या नातेवाईकांना महामंडळातर्फे दहा लाखांची मदत केली जाणार आहे. तसेच जे प्रवासी जखमी आहेत त्यांच्यावर होणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च एसटी महामंडळातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.


मालेगावात रिक्षा-एसटीचा विचित्र अपघात



जखमींना तातडीने सर्व वैद्यकीय मदत, मुख्यमंत्र्यांचे निर्देश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मालेगाव-देवळा रस्त्यावर आज सायंकाळी एसटी बसच्या झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला असून जखमींना तातडीने योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांना आवश्यक तो सर्व औषधोपचार देण्याचेही त्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे.



बचाव कार्य अधिक वेगाने व्हावे यासाठी एनडीआरएफच्या जवानांची मदतही घ्यावी तसेच मृत व जखमींच्या नातेवाईकांना सर्व आवश्यक सहाय्य करावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जखमींवर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि नऊ डॉक्टर जातीने लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली.


अपघात झाल्याचे कळताच पाच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून विहिरीत पडलेली बस देखील काढण्यात आली आहे. आज सायंकाळी कळवण डेपोची उमराणे - देवळा बस आणि रिक्षा यांचा अपघात होऊन दोन्ही वाहने विहिरीत कोसळली होती.