औरंगाबाद : राज्यामध्ये सत्तास्थापनचे पेच अजूनही कायम असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. परताची पाऊस जाताना म्हणतोय मी पुन्हा येईन, त्यामुळे लोकांना त्याची भीती बसली आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी पुन्हा येईन असं वारंवार म्हटलं होतं. यावरुनच उद्धव ठाकरेंनी त्यांना चिमटा काढला, परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव मराठवाड्यात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान सत्तास्थापनचा पेच लवकरच सुटेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस हे अकोल्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


परतीच्या पावसामुळे शेतक-यांवर संकट आहे हे पाहाता सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे. काळजीवाहू सरकारलाही काही ना काही बंधनं असतात, तरी जे निर्णय घेता येतात ते काळजीवाहू सरकार घेतच आहे. त्यामुळे राज्याचं हित पाहता लवकरात लवकर सरकार स्थापन होणं गरजेचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


सगळ्यांना महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचं आहे. राज्याच्या शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे. या संकटामध्ये नवीन सरकार लवकरात लवकर स्थापन होईल, अशी माझी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.


दुसरीकडे आज रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि भाजपच्या कोर टीममधील काहींची वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. आत्तापर्यंत भाजप मुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थ, महसूल, नगरविकास ही खाती आपल्याकडे ठेवण्यावर भाजप ठाम होतं. पण परिस्थिती चिघळल्यामुळे महसूल आणि वित्त विभाग ही खाती शिवसेनेला देऊन नाराजी दूर करता येईल का? याबाबत भाजपने विचार सुरू केल्याची माहिती आहे. काही महत्त्वाची खाती शिवसेनेला दिली जाण्याची शक्यता आहे.