ठाणे : राज्यात युती तुटल्यानंतर भाजपला अनेक ठिकाणी फटका बसताना दिसत आहे. नाशिकमध्ये भाजपची सत्ता असताना तेथे त्या पक्षाचा महापौर होण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. भाजपचे सहा नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. तशीच परिस्थिती उल्हानगर महापालिकेत पाहायला मिळणार आहे. उद्या होणाऱ्या उल्हासनगर  महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत नवीन समीकरण जुळताना पाहायला मिळणार आहे. भाजप गेली अडीच वर्ष सत्तेत असलेला साई पक्षाला महापौर देण्याची दाट शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साई पक्षाला महापौर पद देण्याची शक्यता असली तरी भाजपसोबत असलेल्या टीम ओमी कलानीच्या सात ते आठ नगसेवकांची भूमिका निवडणुकीदरम्यान काय असेल त्यावर महापौरपदाची सगळी गणित अवलंबून आहेत. साई पक्षाचे १२ नगरसेवक भाजपमध्ये विलीन झाल्याने २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महापौर पदाचा निवडणुकीत साई पक्षाचे जीवन इदनानी यांना महापौर पद मिळणार आहे. तसे संकेत माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. 


भाजपमधील टीम ओमी कलानींचे बंड शमवण्यासाठी हा निर्णय भाजपने घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या सर्व घडामोडीमुळे मात्र राज्यत नव्याने उदयास आलेल्या महाविकास आघाडीचे महापौर पदाचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.