Ulhasnagar Crime News: देशात गुन्हेगारीचा आलेख वाढल्याचे चित्र आहे. क्षुल्लक कारणावरुन जवळच्याच लोकांकडून दिवसाढवळ्या हत्या घडत आहेत. कल्याणजवळच्या उल्हासनगर येथेही एक भयंकर हत्याकांड घडलं आहे. मित्रानेच जवळच्या मित्राची हत्या केली आहे. उल्हासनगरात दारू कमी दिल्याने मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढदिवसाच्या पार्टीत दारु कमी दिल्याच्या रागातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आपल्याच मित्राच्या घरी जाऊन मारहाण करून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून देऊन खून केल्याची खळबळजनक घटना दोन दिवसापूर्वी उल्हासनगरात घडली आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना काल विठ्ठलवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.


दोन दिवसापूर्वी कार्तिक वायाळे या तरुणाचा वाढदिवस होता. त्यावेळी त्याने आपल्या मित्रांना वाढदिवसाची पार्टी दिली होती. त्यावेळी पार्टीत दारु देण्यावरुन कार्तिकचा मित्र निलेश यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी कार्तिक याने निलेशच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली होती. या भाडणांचा राग मनात धरुन निलेश क्षीरसागर ,सागर काळे, धिरज नंदकुमार यादव या तिघांनी संगनमत करुन कार्तिक विरोधात कट रचला. 


कार्तिक वायाळ राहात असलेल्या इमारतीत जाऊन कार्तिक झोपलेला असलेल्या बेडरूममध्ये जाऊन सुरुवातीला त्याला जबर मारहाण केली आणि त्याला बेडरूममधुन उचलून चौथ्या मजल्यावरुन खाली फेकून दिले. चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळल्यामुळं कार्तिक गंभीर जखमी झाला होताय त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. 


कार्तिकच्या मृत्यूप्रकरणी सुरुवातीला विठ्ठलवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु पोलिसांनी सखोल तपास केला असता हत्या झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी चिंचपाडा भागातून तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र झालेल्या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे.


वर्दळीच्या ठिकाणी तरुणावर प्राणघातक हल्ला 


कल्याण मध्ये अतिशय वर्दळीच्या ठिकाणी एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. कल्याण पूर्वेतील शंभर फुटी चौक परिसरात या प्राणघातक हल्ल्याची घटना घडली आहे. चार ते पाच जणांनी संदीप राठोड या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला आहे. कल्याण पूर्वेचा हा चौक अतिशय गजबजलेला असून वर्दळीचा आहे आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी या टोळीने संदीपवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये संदीप गंभीर जखमी झाला होता त्याला खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना संदीप चा मृत्यू झाला आहे.