श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ: मत्स्य व्यवसायातील स्पर्धेतून यवतमाळमधली धरणांमध्ये विष टाकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. येथील गोकी आणि अरुणावती प्रकल्पात विष प्रयोग झाल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या धरणातील मासे मोठ्याप्रमाणात मृत्यूमुखी पडल्याने ही बाब कंत्राटदार कंपनीच्या निदर्शनास आली. याची अधिक चौकशी केली असता अवैध मासेमारी आणि व्यावसायिक स्पर्धेतून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. 


गोकी धरणाच्या ८६० हेक्टर क्षेत्रातून मत्स्यव्यवसायासाठी गोपालकृष्ण भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेला मासेमारीचे कंत्राट देण्यात आला असून प्रकल्पामध्ये सदस्यांकडून गस्त असतानाही पाण्यात विषाचा प्रयोग झाला आहे. 


विशेष म्हणजे गोकी धरणातून यवतमाळ शहरात देखील पाणीपुरवठा होतो. त्यामुळे विषप्रयोगाच्या तक्रारीमुळे नागरिकांमध्ये देखील धास्ती निर्माण झाली आहे. भातात विष मिसळून ही मासेमारी होत असल्याची माहिती असून विषप्रयोग झालेले मृत मासे बाजारात विकले जात आहेत का, याबाबत देखील तपासणीची आवश्यकता आहे. 


गोकी व अरुणावती प्रकल्पातील मासे आणि झिंगे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत चौकशी व कारवाई करण्याची मागणी स्थानिक मत्स्यव्यवसायिकांनी केली आहे.