सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याची गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून काल त्यांनी पुढील वाटचाल ठरवण्यासाठी पुण्यात कार्यकर्त्यांशी चर्चा देखील केली. या बैठकीत भाजपमध्ये जायचे की नाही यावर सविस्तर चर्चा झाली. मात्र अंतिम निर्णय होऊ शकला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या पद्धतीने खासदार उदयनराजे भाजपमध्ये निर्णयासाठी अनुकूल परिस्थिती पाहात असले तरी त्याचा कार्यकर्त्यांमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. एक गट उदयनराजे यांनी भाजपमध्ये जावे, असे म्हणत आहे. तर दुसरा गट राष्ट्रवादीमध्येच राहण्यासाठी आग्रह धरतो आहे. त्यामुळे खासदार उद्यनराजे भोसले नेमका काय निर्णय घेतायत हे पाहावे लागणार आहे. 


दरम्यान, समर्थकांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत उदयनराजेंनी म्हटले होते की, जे काही होईल ते लोकांच्या हिताचे होईल. माझ्यासोबतच्या सहकाऱ्यांना मी विचार करून निर्णय घ्या, असे सांगितले होते. गेली २५-३० वर्षे हे लोक माझ्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय माझ्यासाठी महत्त्वाचा असल्याचे उदयनराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. कार्यकर्त्यांच्या या बैठकीत उदयनराजेंनी राष्ट्रवादीबद्दल नाराजी व्यक्त केली. माझ्यावर खंडणीसारखे गुन्हे दाखल झाले तेव्हा राष्ट्रवादीचे नेते काहीच बोलले नाहीत. पक्षातल्या कोणीच मला विचारलं नाही. मग राष्ट्रवादीसोबत का राहायचे?, असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला.


'भाजपची वाटचाल जोरात असली, तरी नाण्याला दोन बाजू असतात. भाजपच्या कामगिरीमुळे लोकं त्रस्त आहेत. कंपन्या बंद पडत आहेत, कामगारांच्या नोकऱ्या जात आहेत. सत्ता भाजपकडे आहे म्हणून तिकडे जाणं योग्य नाही,' असेही मत उदयनराजेंनी व्यक्त केले होते.