Nagpur Crime News : जगभरात नववर्षाचे स्वागत होत असताना नागपूर पुन्हा एकदा हत्येचे घटनेने हादरलं आहे. नागपुरात गुन्हेगारीच्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पाचपवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत कमाल टॉकीज रोडवर राजेश मेश्राम नामक तरुणाची तिघांनी कारने पाठलाग करत तलवारीने वार करत हत्या केली आहे. मृतक तरुण एका टपरीवर दुचाकीने येऊन थांबला असताना पाठलाग करत कारमधून आलेल्या तिघांनी त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले. मृतक तरुण स्वतः चा जीव वाचवण्यासाठी काही अंतरावर धावत गेला. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं तरुणाचा अखेर त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारमधून आलेल्या तिघांचा शोध सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल नगर भागात राहणारा 25 वर्षीय तरुण कमाल टॉकीज रोड परिसरात आला होता. यावेळी पानटपरीवर गुटखा घेण्यासाठी थांबला होता. मात्र काही जण त्याचा कारने पाठलाग करत होते. तरुणाला थांबलेले पाहताच कारमधून उतरलेल्या व्यक्तींनी तरुणावर तलवारीने सपासप वार केले. पूर्वाश्रमीच्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. मात्र राज्याच्या गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यात जिल्ह्यात दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


"सकाळी साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान मृतक तरुण आपल्या बाईकवरुन कमाल चौकातून पानटपरीवर आला होता. त्यावेळी मेहंदीबाग परिसरातून ऑल्टो कारमधून आलेल्या तिघांपैकी एकाने तलवारीने तरुणावर वार केले. यावेळी त्यांच्यात तू कल मुझे ऐसा क्यु बोला अशा प्रकारचा संवाद झाला. हल्ल्यानंतर तरुण जीव वाचवण्यासाठी तिथून पळाला. आरोपींबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सीसीटीव्हीच्या आधारे आणि स्थानिक गुप्तहेरांच्या आधारे पुढील तपास सुरु आहे. मृतक वर्षभरापूर्वी पाण्याच्या कॅनची विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे.