सातारा : साताऱ्यातील बेपत्ता जवान दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबीयांची व्यथा 'झी २४ तास'नं मांडताच प्रशासनाची धावाधाव सुरु झालीय. आर्वीतील जवान दत्तात्रय राऊत गेल्या १७ वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या पश्चात जिल्हा प्रशासन, जिल्हा सैनिक कल्याण बोर्डच्या गलथान कारभारामुळे दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबाची हेळसांड सुरु आहे, असं वृत्त आम्ही प्रसारीत केलं होतं. 


हे वृत्त प्रसारीत होताच अवघ्या बारा तासांतच पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचे सर्व अधिकाऱ्यांनी जवानाच्या कुटुंबीयांची भेट घेतलीय. 


यावेळी जवान दत्तात्रय राऊत यांच्या आईचे पेन्शन सुरु करणार असल्याची ग्वाही देण्यात आली. तसंच दोन महिन्यात सैनिक कल्याण बोर्ड सर्व मदत करणार असल्याचं आश्वासनही यावेळी देण्यात आलं.