मुंबई : कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असला तरी एक दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार २९७ झाली आहे. बुधवारी २२५० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल ६७९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सध्या १८४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून कालपर्यंत एकूण १५ हजार ४९५ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.११ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ०७ हजार ७२ नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ७७५जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३९ हजार २९७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ०४ हजार ६९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६ हजार ७५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.



दरम्यान,  प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. 



राज्यात काल ६५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण संख्या १३९० झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४१, पुण्यात १३, नवी मुंबईमध्ये ३, पिंपरी- चिंचवड -२, सोलापूरात २, उल्हासनगरमध्ये २, तर औरंगाबाद शहरात २ मृत्यू झाले आहेत.