मुंबई : अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी कारवाई करत २३ बांग्लादेशी नागरिकांची धरपकड केली आहे. गेल्या काही दिवसात वसई-विरारमध्ये अवैध्यरीत्या राहणाऱ्या नायजेरियन आणि बांग्लादेशी नागरिकांवर अनैतिक मानवी वाहतूक शाखा, दहशतवादी विरोधी पथकाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरार पश्चिम येथील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या परिसरात अनैतिक मानवी वाहतूक शाखा, दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमूख मानसिग पाटील,पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांच्या पथकाने ताब्यात घेतलेले हे बांग्लादेशी नागरीक भंगारचा व्यवसाय व मोलमजुरी करण्यासाठी आले होते असे ,पोलीस तपासात उघड झाले आहे.मंगळवारी रात्री बारा वाजता ही कारवाई करण्यात आली असून पहाटे चार वाजता अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अर्नाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी दिली.


मनसेच्या मोर्चाचे यश - देशपांडे


दरम्यान, अर्नाळा,विरार इथे पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन करून २३ बांग्लादेशींना पकडले आहे, हे मनसेच्या मोर्चाचे यश आहे. ४८ तास पोलिसांना सूट दिली तर अश्या बांग्लादेशीचा मुद्दा निकाली निघेल. आम्हाला अनेक ठिकाणाहून लोक बांग्लादेशींची माहिती देत आहेत, आम्ही ती पोलिसांपर्यंत पोहोचवत आहोत, अशी माहिती मनसेचे नेते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली. अर्नाळा पोलिसांचे कौतुक करतोय सर्व पोलिसांनी आपल्या हद्दीत अशी कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले.