दारुड्यामुळे लालबाग परिसरात बेस्ट बसने 9 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारु ढोसून बसमध्ये प्रवास करणा-या दत्ता शिंदेमुळे नुपूरा मणियारचा हकनाक बळी गेला. 28 वर्षांची ही नुपूरा मणियार काही महिन्यांआधीच इन्कम टॅक्समध्ये नोकरीला लागली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर आई आणि बहिणीला सांभाळणारी नुपूरा घरातली एकमेव कर्तीधर्ती मुलगी होती. तिचं लग्न ठरलं होतं आणि काही दिवसांतच साखरपुडा होणार होता. मात्र आज ती जग सोडून गेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दारुडा दत्ता शिंदे तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. दारु ढोसून बसमध्ये प्रवास करणा-या दत्ता शिंदेमुळे नुपूरा मणियारचा हकनाक बळी गेला. 


बेस्ट बसची 66 नंबरची इलेक्ट्रिक बस बॅलार्ड पिअरवरुन राणी लक्ष्मीबाई चौक म्हणजे सायनला जात होती. लालबागच्या गणेश टॉकीजजवळ बस पोहोचली होती. तेव्हाच हा दारुडा दत्ता शिंदे आणि बस ड्रायव्हरमध्ये वाद झाला. बस स्टॉप नसतानाही हा दारुडा बस थांबवा म्हणून सांगत होता. त्याने ड्रायव्हरसोबत वाद घातला आणि बसचं स्टेअरिंगच खेचलं. बसचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्यावरच्या गाड्यांना धडक दिली. या घटनेत नुपूर मणियारनं नाहक जीव गमावला.


अपघातानंतर हा दारुडा प्रवासी दत्ता शिंदे पळून जात होता. मात्र कंडक्टरने त्याला पकडलं. काळाचौकी पोलिसांनी दत्ता शिंदेवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. आपली काहीच चूक नसताना नुपूराचा जीव गेला, मणियार कुटुंबाचा आधार गेला. नुपुराच्या आई आणि बहीणीला मदत करण्याची मागणी आता मुंबईकरांनी केली आहे.