मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. काल १०२६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. राज्यात मंगळवारी  ३३९ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  ५१२५ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२८९ कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून मंगळवारी एकूण १२ हजार ९२३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५४.९२  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.



आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार ६४५  नमुन्यांपैकी १ लाख ९५ हजार ८०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत तर २४ हजार ४२७ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ८१ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


मंगळवारी राज्यात ५३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या आता ९२१ झाली आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २८, पुण्यात ६, पनवेल मध्ये ६, जळगावमध्ये ५, सोलापूर शहरात ३,  ठाण्यात २,  रायगडमध्ये १, औरंगाबाद शहरात १ आणि अकोला शहरात १ मृत्यू झाला आहे. मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २४ महिला आहेत.