मुंबई : मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे चेंबूर, हिंदमाता, सायन, कुर्ला यांसारख्या अनेक सखल भागांमध्ये पावसामुळे पाणी साचलेलं पहायला मिळालं. याचा रस्ते वाहतूकीवर मोठा परिणाम पाहिला मिळाला. अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झालं होतं. पावसाचा फटका मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेनला देखील बसला. यामध्ये मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच मुद्दयावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन मुंबई महापालिकेच्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे. साचलेल्या पाण्यात उभं राहून अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. आणि यात त्यांनी म्हटलंय, 'या शहराच्या प्रत्येक वळणावर खड्डे सापडतील, पण शोधलं तर एक गुन्हेगारही सापडणार नाही'. या ट्विटच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे. 



दरम्यान याआधीही पहिल्या पावसातचं मुंबई तुंबल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत पालिकेच्या कामावर टीका केली होती. 'जी तोंडापर्यंत उडत होती ती आता पायांना चिकटली आहे. पाऊस पडताच मातीने देखील आपली नियत बदलली' अशा आशयाचं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. पर्यटन मंत्री आणि युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी यंदा मुंबईत पाणी साचणार नाही, असा दावा केला होता. त्याचबरोबर महापालिकेकडून नालेसफाई करण्यात आल्याचं म्हटलं होतं. मात्र पहिल्या पावसानेच मुंबईला वेठीस धरलं. मुंबईत पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला.