मुंबई :  राज्यकार माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. या आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने चांदीवाल आयोग नेमला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांदीवाल आयोगाने चौकशी करून आपला अहवाल तयार केला. हा अहवाल आयोगाने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे दिला. त्यांनतर गृहमंत्री वळसे पाटील यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा अहवाल त्यांच्याकडे सुपूर्द केला.


चांदीवाल आयोगाने मागील महिन्यात चौकशी पूर्ण केली. आयोगाने केलेल्या चौकशीच्या आधारे सुमारे 200 पानांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयोगाने आपल्या अहवालात देशमुख यांना क्लिनचिट दिल्याचे समजते.


माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेले आरोप हे कळते - समजतेच्या आधारावर आहेत. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.


अनिल देशमुख यांच्यासाठी हा अहवाल मोठा दिलासा मानण्यात येतोय. त्यामुळे आता राज्य सरकार पुढे काय पावले टाकणार याची उत्सुकता आहे. या अहवालामुळे अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटींचे आरोप हवेत विरले आहेत.