मुंबई : साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाने अयोध्येतल्या राम मंदिरावर शिक्कामोर्तब केले आहे. या निकालावर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अयोध्या निकाल हा लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत करणारा आहे, ते म्हणालेत. हा निर्णय भारतीय लोहशाहीच्या मुल्यांना मजबूत करणारा आहे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येतली वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंदिर बांधण्यासाठी पुढच्या तीन महिन्यांत ट्रस्ट स्थापन करण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाचा दावा न्यायालयाने फेटाळला असला तरी सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच पाच एकर जमीन देण्याचे आदेशही दिले आहेत. पुरातत्व विभागानं दिलेल्या अहवालातल्या पुराव्यांच्या आधारे हा निकाल देण्यात आला आहे. 


फडणवीस म्हणाले, राम जन्मभूमी-बाबरी मशिद वादग्रस्त जागेचा निकाल हा देशात आस्था निर्माण करणारा आहे. जनतेने हा निर्णय अतिशय शांततेत स्विकारला आहे. त्यामुळे मी जनतेचे आभार मानतो. या निर्णयानंतर मुंबईसह महाराष्ट्रात चांगले वातावरण आहे. या निकालाकडे कोणीही जय-पराजय म्हणून पाहू नका. हा निर्णय लोकशाहीची मूल्ये अधिक बळकट करणारा आहे. त्यामुळे देशातील दोन्ही समाजाचे येणारे सण, उत्सव शांततेत पार पडावेत, असेही फडणवीस म्हणाले.