Sanjay Rathod : महाराष्ट्रात नुकतंच  शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis Government) सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. यावेळी महिला आमदारांना कॅबिनेटम्ध्ये स्थान न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर आळवला गेला तर, काही वादग्रस्त नावांना मंत्रीपदं देण्यात आल्यामुळंही शिंदे- फडणवीस सरकारवर अनेकांचा रोष ओढवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रिमंडळात वादग्रस्त आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा समावेश करण्यात आला. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात संजय राठोड यांच्यावर काही गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर ठाकरे सरकारमध्ये असताना संजय राठोड यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. असं असतानाही त्यांना पुन्हा एकदा मंत्रीमंडळात स्थान दिल्यामुळं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. (Banjara community warns chitra wagh to stop criticizing sanjay rathod read details )


वाघ यांनी राठोडांवर केलेल्या टिकेनंतर आणखी एका वादाची ठिणगी पडली आणि बंजारा समाजानं याप्रकरणी विरोधी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. चित्रा वाघ (chitra wagh)यांनी संजय राठोड यांना राखी बांधावी, अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा बंजारा समाजाकडून देण्यात आला आहे. 


राठोडांवर केली जाणारी टीका देशातील सबंध बंजारा समाजावर केली जात असल्याचं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात बंजारा समाजाच्या महंतांनी नाराजीचा सूर आळवला. चित्रा वाघ यांनी सदर प्रकरणी नमती भूमिका घेतली तरच हा वाद मिटेल अन्यथा हा न्याय समाजाकडून सहन केला जाणार नाही असा इशारा बंजारा समाजाच्या वतीनं पत्रकार परिषदेतून देण्यात आला. 


आपल्या वक्तव्यावरून होणारा विरोध पाहता आता खुद्द वाघ यावर काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.