मुंबई : कोकणातील राजापूर येथील नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. मात्र, भाजपने हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे या प्रकल्पावरुन भाजप आणि शिवसेनेत कमालीचा तणाव वाढीला लागलाय. दरम्यान, नाणार प्रकल्पावर राजकीय वातावरण तापले असताना आता भाजपचे नाराज आमदार नाणार प्रकल्पावरुन शिवसेना पक्षप्रमुख यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीत काय होणार याची उत्सुकता लागलेय. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार प्रकल्पावरून सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्येच एकवाक्यता नसल्याचं सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट झालं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणारमध्ये जाऊन प्रकल्पग्रस्तांची सभा घेतली. त्यावेळी प्रकल्पाची अधीसूचना रद्द केल्याचे जाहीर केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझा अधिकार आहे, अधिसूचना रद्द केली नसल्याचे सांगून शिवसेनेच्या शिडातील हवाच काढून घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. आज सायंकाळी ६.३० वाजता 'मातोश्री'वर ते भेट घेणार आहेत. नाणारचा तेलशुध्दीकरण प्रकल्प विदर्भात आणावा, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे. त्याच पाश्वभूमीवर ही भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे, त्यात ठाकरे- देशमुख ही भेट म्हणजे मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.



 नाणार प्रकल्पावरून एकवाक्यता नाही!


रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार प्रकल्पावरून सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्येच एकवाक्यता नसल्याचं सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट झालं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणारमध्ये जाऊन प्रकल्पग्रस्तांची सभा घेतली. या सभेत नाणार प्रकल्पासाठीची भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.


सुभाष देसाईंच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरेंनाही दहा हत्तींचं बळ आलं. नाणार प्रकल्प गेला, अशी गर्जना त्यांनी राणा भीमदेवी थाटात केली. नाणारसोबत जैतापूरचा प्रकल्पही नागपूरला किंवा गुजरात न्या, असं सांगत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदी-शाह जोडीवर तोंडसुख घेतलं.मात्र, शिवसेनेचा हा जल्लोष औट घटकेचाच ठरला. मंत्र्यांना अधिसूचना रद्द करण्याचा अधिकारच नाही, याची आठवण सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी करून दिली आणि नाणारचा प्रकल्प रद्द करण्यात आला नसल्याचं स्पष्ट झालं.


दरम्यान, अधिसूचना माझ्या सहीनं निघाली असल्यानं ती मीच रद्द करणार, असं उद्योगमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावलंय. मुख्यमंत्र्यांना त्यांचं मत मांडायचा अधिकार आहे. मी माझी कार्यवाही केली आहे. ते जे काय बोलले ते मला खोडायचे नाही. त्यांना त्यांचं मत मांडायचा अधिकार आहे, मला माझं मत मांडायचा अधिकार आहे, असंही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलंय. त्यामुळे भाजप-शिवसेनेत तणाव वाढलाय. त्यातच नाराज आमदार आशिष देशमुख शिवसेनेच्या नेत्यांना भेटत असल्याचे वेगळीच राजकीय चर्चा रंगलेय.