Mumbai Metro 3 Update:  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MSRC) मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल रनचे काम सुरू केले आहे. मुंबईकरांचा प्रवास सध्या लोकल, बेस्ट आणि मेट्रो यावर अवलंबून आहे. प्रशासनाकडून मुंबई व मुंबई लगतच्या शहरांत मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. जेणेकरुन मुंबईकरांचा प्रवास सोप्पा होणार आहे. मुंबई मेट्रो 3 या वर्षांत मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. त्यादृष्टीने मेट्रोच्या ट्रायल रन सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रोची चाचणी बीकेसीऐवजी वरळीपर्यंत सुरू केली जाणार आहे. येत्या काही आठवड्यात मेट्रोची चाचणी सुरू होणार आहे. वरळीपर्यंत मेट्रोच्या रूळांचा काम खूप आधीच झाले होते. तसंच, या मार्गावर इतर उपकरणे बसवण्याचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. गतवर्षी मेट्रो-3च्या आरे ते बीकेसीपर्यंत मेट्रोच्या इंटीग्रेटेड चाचण्या सुरू होत्या. पहिल्या टप्प्यात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या येत्या दोन महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. 


एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनुसार, आरे ते बीकेसीदरम्यान होणाऱ्या चाचण्या आता अंतिम टप्प्यात आहेत. सध्या ट्रेनमध्ये वजन ठेवून ट्रेन व मार्गिकांची चाचणी करण्यात येत आहे. या चाचण्यादरम्यान मेट्रोचा वेग 95 किलोमीटर प्रतितास इतका ठेवण्यात येणार आहे. मेट्रो धावल्यानंतर सिग्नलिंग सिस्टम, टेलीकम्युनिकेशन, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोर आणि ट्रॅकची टेस्टिंगचेदेखील काम सुरू आहे. त्यानंतर अंतिम चाचण्यांसाठी मेट्रो रेल्वे सेफ्टी बॉर्डला बोलवण्यात येईल. 


दुसऱ्या टप्प्यातील कामाला वेग


पहिल्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर मेट्रो प्रशासन दुसऱ्या टप्प्यातील कामाचा वेग वाढवला आहे. पहिल्या टप्प्यात 9 ट्रेनने सेवा सुरू होणार आहेत. सर्व 9 ट्रेनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. एमएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या टप्प्यात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी मेट्रोच्या अतिरिक्त 11 ट्रेन मुंबईत पोहोचणार आहेत. अतिरिक्त 11 ट्रेनच्या टेस्टिंगचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. 


तीन टप्प्यात मिळणार सेवा


आरे ते कुलाबादरम्यान भुयारी मेट्रो लवकरच प्रवाशांचा सेवेत येणार आहे. संपूर्ण मार्गावर बोगदे खोदण्याचे व रुळ निर्माण करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. संपूर्ण मार्गावर उपकरण लावण्याचे काम सुरू आहे. मेट्रो मार्ग 95 टक्के पूर्ण झाला आहे. एमएसआरसीने मेट्रोने संपूर्ण मार्गावर तिन टप्प्यात सेवा सुरू करण्याची योजना बनवली आहे. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी, दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते वरळी आणि तिसऱ्या टप्प्यात वरळी ते कुलाबा अशी मेट्रो सेवा चालवण्यात येणार आहे. जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यात मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. तर, 2024च्या अखेरीस किंवा 2005च्या सुरुवातीच्या महिन्यात संपूर्ण मार्गावर सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.