दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर, ठाण्यासह राज्यातील 18 महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या महानगरपालिकांचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने पत्र पाठवले आहे. निवडणूक आयोगाने 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या महानगरपालिकांच्या आयुक्तांना हे पत्र पाठवले आहे. यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी- निजामपूर, मीरा-भाईंदर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्व महापालिकांची लोकसंख्या आणि व्यापकता लक्षात घेता निवडणुका वेळेवर घेण्यासाठी आत्तापासूनच प्रकार प्रभाग रचना करणे आवश्यक असल्याच्या निवडणूक आयोगाच्या महापालिका आयुक्तांना सूचना आहेत.


राज्य सरकारने बहुसदस्य प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्य प्रभाग पद्धत लागू केली आहे त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असणार आहे. यापूर्वी काही महापालिकांमध्ये प्रत्येक प्रभागात किमान ३ सदस्य होते.


शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ३ पक्षांची युती झाल्यानंतर पहिल्यांदाच महत्त्वाच्या शहरांच्या महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. यात ३ पक्षांचं आघाडी सरकार तयार झाल्यानंतर पहिल्यांदाच जनतेकडून काय कौल येतोय, तो या ३ पक्षांच्या बाजूने असेल की भाजपाच्या बाजूने हे दिसून येणार आहे.


एकीकडे काँग्रेसने स्वबळावर महापालिका निवडणुका लढवण्याचं तुणतुणं कायम ठेवल्याने काँग्रेस शेवटपर्यंत यावर कायम राहते का, आणि यानंतर काँग्रेसला किती यश मिळतं हे देखील स्पष्ट होणार आहे.