मुंबई : मुंबई महापालिकेचे ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सादर केला. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर करवाढीचा कोणताही बोजा लादण्यात आलेला नाही. तर महसुलात वाढ होईपर्यंत रिक्त पदांवरील भरती तसंच निवृत्तीमुळं रिक्त होणारी पदे भरली जाणार नाहीत, अशी घोषणाही बजेटमध्ये आयुक्तांनी केली आहे. त्यामुळं दरवर्षी २५० कोटी रुपयांची बचत होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापुढे लिपिक तसेच उद्यान, विधी, अभियंता विभागातील तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदं ६ महिने किंवा १ वर्षासाठी कंत्राटी पद्धतीनं भरली जाणार आहेत. त्यांना पालिकेतील नोकरीवर अधिकार सांगता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पालिकेच्या मालकीच्या भूखंडावरील प्रलंबित पुनर्विकास राबवून त्याद्वारे येत्या वर्षात १२५ कोटी रुपये, तर ४-५ वर्षात ९५० कोटी रुपये उत्पन्न मिळवण्यात येणार आहे. 


भाडेपट्ट्यांने दिलेले भूखंड मक्ता पद्धतीने दिले जाणार आहेत. यामुळे पालिकेस अधिमुल्य, भूभाडे, मिळेल. परिणामी दरवर्षी महसुलात ५०० कोटी इतकी वाढ होईल अशी अपेक्षा आहे. कोस्टल रोडला मागील बजेट मध्ये १६०० कोटी रुपये दिले होते. आता त्यात वाढ करून २ हजार कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.