Central Railway: उशिरा येणाऱ्या लोकल, एसी ट्रेनमुळे रद्द होणाऱ्या इतर लोकल, गर्दीतून प्रवास यामुळे मध्य रेल्वेचे (Central Railway) प्रवासी आधीच त्रासलेले असतात. त्यातच आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांना एका नव्या दिव्याला सामोरं जावं लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही नीट निरीक्षण केलं असेल तर मध्य स्थानकावर लोकलच्या डब्यांची जागा बदलली आहे. यामुळे प्रवाशांना धावपळ करावी लागत आहे. नेमकं असं का होत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यामागे 15 डब्याच्या लोकल कारणीभूत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकलचा डबा नियोजित स्थळी येत नसल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा गोंधळ होत आहे. खासकरुन प्रथम श्रेणी, महिला, दिव्यांग यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसंच स्थानकातील डब्यांच्या रचनेबाबतच्या फलकात बदल कोणताही बदल केल जात नसल्याने प्रवाशांची आणखीनच कोंडी होत आहे.


कल्याण दिशेकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील 12 डब्यांच्या 108 लोकल फेऱ्या आहेत. तर याच मार्गावर 15 डब्यांच्या लोकलसाठी फक्त 11 फेऱ्या आहेत. 12 आणि 15 डब्याच्या लोकलमधील मोटरमनचा अनेकदा गोंधळ होत असल्याने मोटरमन संघटनेकडून एकच थांबा करण्याची मागणी केली गेली होती. मध्य रेल्वेने जरी प्रवाशांच्या सोयीसाठी 15डब्याच्या लोकल चालवायला सुरुवात केली असेल, तरी मात्र एक आठवडा आधी उद्घोषणेद्वारे किंवा जाहिरातीद्वारे प्रवाशांना याची माहिती करून देणे गरजेचे होते अशी भावना कल्याण कर्जत कसारा रेल्वे प्रवासी संघटनेने व्यक्त केली आहे.