मुंबई : मुंबई लोकल कधीही सुरू करण्याची आपली तयारी आहे, मात्र राज्य सरकारच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करत आहोत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेनं लोकल सुरू करण्याची निर्णय प्रक्रिया देखील ट्वविटरवर समजावून सांगितली आहे. राज्य सरकारनं विनंती केल्यानंतर रेल्वे मंत्रालय गृह खात्याला कळवेल, त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, आणि मग लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईलस असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून बंद झालेल्या लोकल ट्रेन अजूनपर्यंत सुरू झालेल्या नाहीत. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रेन ५ महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद ठेवण्यात आल्या आहेत. या काळामध्ये रेल्वेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे. सध्या मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच रेल्वे सुरू आहेत. १५ जूनपासून मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी रेल्वे सुरू करण्यात आल्या होत्या.