मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळींत राहणा-या पोलिसांच्या घरांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रीस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना दिवंगत पोलीस आणि सेवानिवृत्त पोलिसांच्या कुटुंबीयांना घरं देण्याबाबत ही मंत्री समिती निर्णय घेणार आहे. दरम्यान, बीडीडी पुनर्विकासात कुणीही बेघर होणार नाही, याची काळजी घ्या, अशी सूचनाही त्यांनी अधिका-यांना केली.


दिवंगत, निवृत्त पोलिसांच्या कुटुंबियांना घरं?


काही दिवसांपूर्वी वरळी, शिवडी, नायगाव, डिलाईल रोड येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त पोलिसांना घरे खाली करण्यासाठी पोलीस खात्याने नोटीस दिली होती. कोरोना काळात घरे खाली करण्याची नोटीस दिल्याने सेवानिवृत्त पोलीस आणि त्यांचे कुटुंब संकटात सापडले होते. याप्रकरणात निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी भाजप आमदार सुनील राणे यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.