मुंबई : काहीही झाले तरी वाढीव वीजबिल (Electricity Bill ) भरू नका, असे आवाहन मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. दरम्यान, वाढीव वीजबिलांविरोधात मनसेचा काल एल्गार पुकारला होता. राज्यात अनेक जिल्ह्यांत मोर्चे काढून निषेध नोंदवला. वीज बिल माफ करा, अशी मागणी यावेळी मनसेने केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढीव विजाबिलांच्या मुद्द्यावरुन मनसेने राज्यभर आंदोलनाचा धडाका लावला. तर दुसरीकडे काहीही झाले तरी वीजबिल भरू नका असं आवाहन स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जनतेला केले. ही संघर्षाची वेळ नाही, सरकारने भान ठेवावे, असा इशाराही राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे.



वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भाजपच्या वीज बिल होळी आंदोलनानंतर काल मनसेने वाढीव वीज बिलाविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार आंदोलन केले. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबादेत मनसेने वाढीव वीज बिलांविरोधा एल्गार पुकारला होता.  



पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला वीज बिल भरू नका असे आवाहन केले आहे. जर वीज कनेक्शन कापायला कोणी आले तर संघर्ष हा महाराष्ट्र सैनिकांसोबत होणार आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.  तसेच हे पत्र मनसे पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच वीज बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शन कापायला कोणी आले, तर त्यांच्या कानाखाली इलेक्ट्रिक शॉक काढायला महाराष्ट्र सैनिक तयार आहेत, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.


ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांना वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरुन आंदोलन केले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सरकार विरोधात घोषणा दिल्या. आंदोलना दरम्या पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.  तर नवी मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांनी वीज बिल वाढीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  नवी मुंबईतील मनसेकडून सिबीडी येथे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने अनेक वेळा आश्वासन देऊनही वीज बिलात कोणत्याही प्रकारची सूट मात्र अद्याप दिलेली नाही. हजारो रुपयांची विजबिले कशी भरायची, त्यामुळे सरकारने त्वरित वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे.