मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. येणाऱ्या काळात तो आणखी वाढण्याची भीती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही कठोर निर्णय घेतात की, जनतेला आणखी काही सवलत देतात याकडे लक्ष लागलं आहे. मुंबईतील लोकलसेवा अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी सुरु आहे. हळूहळू लोकलमधून प्रवासासाठी परवानगी दिली जात आहे. मेट्रो सेवा सुरु करण्यासंदर्भात देखील चर्चा सुरु होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिम राबवण्याबाबत जाहीर केलं होतं. त्याबाबत देखील मुख्यमंत्री आज बोलू शकतात.
'"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" कार्यक्रमात सर्वांनी एकत्रितपणे काम केले तर आपण संकटापासून सुरक्षित राहू व जनतेला सुरक्षित ठेऊ. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.


१५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबवली जाणार आहे. आरोग्य सेवक, महसूल यंत्रणा, नगरपालिका, महापालिका, ज्या यंत्रणा आहेत त्यातील सगळी माणसे, त्यांनी प्रत्येक घरात जाऊन चौकशी करणार आहेत. ही जनजागृतीची मोहीम महाराष्ट्रामध्ये पहिल्या फेरीत २२ दिवस व दुसऱ्या फेरीत १२ दिवस होणार आहे. यामध्ये कुटुंबाच्या आरोग्याविषयी जाणून घेतले जाईल, ते High Risk गटातील आहेत का, ज्येष्ठ नागरिक, इतर आजार असणाऱ्या व्यक्ती शोधण्यात येतील व आवश्यकतेनुसार आपण त्यांच्यावर इलाज करणार आहोत. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.


कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचं पालन होणं आवश्यक आहे. सरकारकडून आवाहन केलं जातं आहे. मात्र तरी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.


याआधी सरकारी यंत्रणा करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असून आता राज्यातील जनतेनं सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं. पण तसं नाही झाल्यास कठोर निर्णय़ घ्यावे लागतील असं देखील मुख्यमंत्र्यांनी याआधी म्हटलं होतं.