मुंबई : महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) सर्व काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. आधीच निधीवाटपात अन्याय होत असल्याची भावना सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांमध्ये आहे. ते कमी झालं म्हणून की काय, काँग्रेस आमदारांनी स्वतःच्याच पक्षाच्या मंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर आळवलाय. एवढंच नव्हे तर थेट काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून 25 आमदारांनी मंत्र्यांविरोधात तक्रारही केलीय. (congress leader nana patole wrote letters to chief minister uddhav thackeray)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे मंत्री आमच्या समस्या, तक्रारी ऐकत नाहीत.आमदारांच्या समस्यांकडे मंत्री कानाडोळा करतात. मतदारसंघातल्या विकासकामांसाठी निधी मिळत नाही. मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळं आगामी निवडणुकीत फटका बसेल, अशी व्यथा आमदारांनी सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रात मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.



त्यामुळं सत्ताधारी आमदारांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट होतंय. मात्र नाना पटोलेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय.


काँग्रेस पक्षातच धुसफूस वाढली असताना, नाना पटोलेंनी थेट महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावरच असमाधान व्यक्त केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून त्यांनी सरकारच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.


गेली तीन वर्षं कोरोनामुळं किमान समान कार्यक्रम राबवणं शक्य झालं नाही. परंतु आता कोरोना संकटाची तीव्रता संपलीय. त्यामुळं किमान समान कार्यक्रम पुन्हा राबवण्यात यावा. दलित, ओबीसी आणि अल्पसंख्याक कल्याणासाठीच्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली जावी, असं त्यांनी पत्रात म्हटलंय.


या लेटर बॉम्बमधून पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना आघाडी धर्माची आठवण करून दिलीय. मात्र काँग्रेस आमदारांची ही नाराजी काँग्रेससाठी आणि महाविकास आघाडी सरकारसाठीही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.