मुंबई : विधानसभेच्या अध्यपदी अखेर नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांसमोर उभ्या असणाऱ्या भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतून माघार घेतली गेल्यामुळे या निवडणुकीत नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाल्याचं स्पष्ट होत आहे. तेव्हा आता विरोधीपक्षनेत्याची रविवारीच निवड केली जाते का, याकडेही साऱ्यांचं लक्ष असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसकडून साकोलीचे आमदार नाना पटोले यांना अध्यक्षपदासाठीची उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात भाजपकडून किसन कथोरे यांचं आव्हान होतं. पण, सत्ताधारी पक्षाच्या सर्व नेत्य़ांनी आवाहन करत महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड ही परंपरागत पद्धतीने बिनविरोध व्हावी असं सांगितल्यामुळे, झालेल्या बैठका आणि चर्चांनंतर, अध्यक्षांचं पद वादात आणायचं नसल्याचं म्हणत भाजपकडून कथोरेंचा अर्ज मागे घेत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. 


भाजपच्या या निर्णयाबद्दल सत्ताधाऱ्यांकडूनही त्यांचं कौतुक करण्यात येत आहे. विरोधी पक्षाने आपला उमेदवार देऊन संख्याबळ नसताना कटूता वाढवण्यामुळे त्याचे परिणामही दिसतात. पण,  विरोधी आणि सत्ताधारी अशा पक्षांना न्याय देण्याचं काम हे विधानसभा अक्ष्यक्षांचं असतं. त्यामुळे अध्यपसाठी आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेत भाजपकडून किसन कथोरे यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय हा प्रगल्भ लोकशाहीसाठी चांगला निर्णय असल्याची समाधानकारक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली. 



विधानसभेच्या अध्यपदी निवड झालेल्या नाना पटोले यांच्याकडून आता पुढील कामकाजासाठी आपण आशावादी असल्याच्या प्रतिक्रिया सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. नाना पटोले यांनी नितीन गडकरींविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. एक आक्रमक नेते म्हणून पटोले यांची ओळख आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये परतले आणि भाजपविरोधात वेळोवेळी त्यांनी सातत्याने आक्रमक भूमिका धेतल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा आता अध्यक्षपदी आल्यानंतर नाना पटोले यांच्या कारकिर्दीकडेही सर्वांच्या नजरा असतील.